गुरुवार, ५ मार्च, २०२०

बघा मुंबई चा जन्म कसा झाला.......


निश्चयाचा महामेरु


निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥
यशवन्त कीर्तिवन्त । सामर्थ्यवंत वरदवन्त । नीतिवन्त पुण्यवंत । जाणता राजा ॥
आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ । सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर । सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली । सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥
देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥
उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥
आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती । धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला । कित्येकांस आश्रयो ज़ाहला । शिवकल्याण राजा ॥
- समर्थ रामदासस्वामी

बुधवार, ४ मार्च, २०२०

शिशिर आणि आनंद नवीन शिवसेना चालू करा आता....!!! असे बाळसाहेब का म्हणाले?

-शिशिर शिंदे


अभिनेता संजय दत्तच्या सुटकेसाठी ख्यातनाम सिनेनिर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या नेतृत्वाखाली सिनेताऱ्यांचा ठाणे जेलवर मोर्चा, पोलिसांचाही निषेधअशी बातमी त्या दिवशी पेपरात वाचली आणि सकाळी सकाळी माझ्या डोक्यात संतापाची सणक गेली. त्यावेळी मी पाठदुखीने बेजार होतो. त्यामुळे घरीच झोपून होतो. मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतरची सकाळ होती ती. मला तो प्रसंग जस्साच्या तसा आजही आठवतो. अभिनेता संजय दत्त पोलिस कोठडी संपवून ठाणे जेलमध्ये गेला होता. त्याच्या सुटकेसाठी त्यावेळचा अतिशय टॉपचा निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई रस्त्यावर उतरला होता. मात्र या मोर्चावर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसैनिकांनी दगडफेक केली. दहाबारा गाड्या फोडून टाकल्या होत्या. सिनेतारे पळून गेले. हे सर्व वाचून मलाही खूप राग आला होता. हा सुभाष घई कोण लागून गेला? माझ्या आणि सुभाष घईंच्या त्यापूर्वी अनेकदा भेटी झाल्या होत्या. त्यांचा फोन नंबर मला पाठ होता. माझ्या घरातील लाल फोनवरुन मी त्यांचा नंबर फिरवला आणि शिवसेना शैलीत माझ्या आवाजाची धार लागली. मात्र हिंदीत!
सुभाष घई है क्या, मै शिशिर शिंदे बात कर रहा हूँ, मुलुंडसे.

बोलो बोलो. नमस्कार शिशिरजी.

सुभाष, मैं शिशिर शिंदे बात कर रहा हूं, मैं अभी तुम्हारा दोस्त नही, तुमने क्या मोर्चा निकाला था संजयके रिहाईके लिए? सुभाष, तुमको लगता है, तुम वहाँ पाली हिलमें रहते हो, मगर ऐसी हरकत की तो तुमको नही छोडूंगा मै. यदि हिंमत हो तो फिरसे मोर्चा अनाऊन्स करो. तुमको घरपे आके नंगा करुंगा. हरामजादे, संजय तुम्हारा कौन लगता है?’ मी फोनवर सुभाष घईचे कपडे काढले. माझा दम ऐकताच घईंनी फोनवर अक्षरश: भोकाड पसरलं- हम इतने बार मिले हैं, मुझे माफ करो’, अशी क्षमायाचना घई फोनवर करायला लागले. मी रागात फोन ठेवून दिला.

पुढच्या बारा-पंधरा मिनिटांतच माझ्या घरचा फोन वाजला. पलीकडून मातोश्रीवरुन राजेंनी सांगितलं, साहेबांना बोलायचंय.
मी - जय महाराष्ट्र साहेब.
साहेब - जय महाराष्ट्र! काय चाललंय तुझं?’
साहेबांच्या आवाजात राग होता.
मी - नाही साहेब, काहीच नाही. मी परवापासून झोपून आहे, पाठ खूप दुखतेय.
साहेब - तू काय सुभाष घईला फोन केला होतास?’
मी - हो साहेब, मोर्चा काढला होता त्याने ठाण्यात. आनंद दिघेंनी दगडफेक केली, त्याच्या मोर्च्यावर.
साहेब - मी एक नालायक सेनापती आहे तुमचा. तू आणि आनंद नवीन शिवसेना चालू करा आता!!!
हे ऐकताच माझी चांगलीच तारांबळ उडाली. मी साहेबांची पुन्हा पुन्हा माफी मागितली. साहेब असा कोणताही विचार नव्हता, पण मला घईचा खूप राग आला होता, अशी विनवणी केली.
गप्प बस एकदम. त्याला काही हात लागता कामा नये,’ असं त्यावर साहेबांनी सुनावलं.

मी पुन्हा साहेबांची माफी मागितली. दहा मिनिटांनी आनंद दिघेंचा फोन आला. तेही तितकेच हबकले होते... शिशिर, साहेबांचा फोन आला होता. मला दम दिला. आयला, तू माझं नाव सांगितलंस. साहेबांनी माझे कान उपटले. तू आणि शिशिर नवी शिवसेना सुरु करा, असं साहेब म्हणाले.
दिघेसाहेब, दोन दिवसांनी आपण एकत्र जाऊया व साहेबांची माफी मागूया’, मी त्यांना सांगितलं.

दहा मिनिटांत पुन्हा घरचा फोन वाजला... माझा ठोका चुकला- पलीकडून बाळासाहेबच बोलत होते- शिशिर, तुझी पाठदुखी वरचेवर सुरु असते. राष्ट्रपतींचे डॉक्टर माझ्याकडे आलेत. तेव्हा तू इकडे ये. तुझ्याकडे गाडी आहेच. पण तू चालवू नकोस, पाठीमागे झोपून ये आणि ड्रायव्हरला चालवायला सांग’, साहेबांचा आवाज अत्यंत प्रेमळ होता. काही क्षणातच मला साहेबांचं दुसरं रुप आता अनुभवयाला मिळत होतं. आधीच्या फोनने मी चिंताग्रस्त असतानाच, आता हा असा फोन अगदी आपुलकी दाखवणारा होता. साहेबांच्या सूचनेनुसार मी कपडे करुन मातोश्रीकडे निघालो. मातोश्री त्यावेळी दुमजली होतं. तिथे बाळासाहेब तळमजल्यावर त्यांच्या खोलीत होते. त्यांनी माझी राष्ट्रपतींच्या डॉक्टरांशी इंग्रजीत ओळख करुन दिली. हा माझा एकदम धडाडीचा शिवसैनिक आहे, असं ते म्हणाले.
साहेबांच्या खोलीत सोफासेट, साहेबांचा कोच आणि दोन खुर्च्या होत्या. डॉक्टरांनी उपचारासाठी मला कपडे काढायला सांगितले. मी अवघडल्यासारखा झालो. साहेबांनी ते जाणलं आणि दरवाजा लावून घेतला. कडी लावली. मी लाजतोय, हे लक्षात आल्यावर ते त्यांच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत म्हणाले. अरे काढ तो झब्बा. आतमध्ये तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाहीये. डॉक्टरांनी मला तपासायला सुरुवात केली, तेव्हा बाळासाहेब माझा झब्बा हातात धरुन उभे होते. माझ्या पाठदुखीपेक्षाही मी त्या प्रसंगाने जास्तच अवघडलो. डॉक्टरांनी साधारण पंधरा मिनिटं छोट्या मशीनने मसाज कम शॉकसारखी ट्रीटमेन्ट केली. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं, पंधरा दिवसांनी दिल्लीला पाठवा. पाठदुखी पूर्ण थांबेल. माझी ट्रीटमेन्ट झाल्यावर साहेबांनी थापाला हाक मारुन डेटॉल व पाण्याचा मग मागवला. डेटॉलच्या पाण्याने कपडा भिजवून त्यांनी तो कोच पुसून काढला. मी आणि थापा मदतीला धावलो. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा झब्बा व लुंगी माझ्या हातात होती. एका शिवसैनिकाचा झब्बा स्वत:च्या हातात घेऊन साक्षात शिवसेनाप्रमुख उभे आहेत, हे दृश्य पूर्णपणे अविश्वसनीय वाटेल. पण बाळासाहेबांचे अफाट मोठेपणच त्यातून दिसते.
बाळासाहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला मुलुंडचे आम्ही सर्व शिवसैनिक मिरवणुकीने वाजतगाजत मातोश्रीवर जायचो. प्रत्येकवेळी मुलुंडची मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असायची. अनेकदा आमच्या मिरवणुकीची वर्दी गेली की बाळासाहेब मातोश्रीतून बाहेर यायचे. शिवसैनिकांमध्ये थोडा वेळ मोकळेपणे मिसळायचे. राज्यात पहिल्यांदा शिवशाही सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्या आलेल्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही नेलेले घोषणांचे बॅनर त्यांनी मातोश्रीच्या गेटवर लावून घेतले होते. बाळासाहेबांचा वाढदिवस नेहमी षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा व्हायचा. १९९१ साली बाळासाहेबांचा ६४ वा वाढदिवस आम्ही मुलुंडच्या कालिदास हॉलसमोरील विशाल मैदानात साजरा केला. बाळासाहेबांच्या वाढदिवासानिमित्त आम्ही लक्ष्मीकांत प्यारेलाल रजनीआयोजित केली होती. एलपीच्या सोबत ३०म्युझिशियन्सचा ताफा होता. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, सुदेश भोसले, असराणी, शेखर सुमन, जॉनी लिव्हर, असे लखलखते तारामंडळ कार्यक्रमाला मुलुंड शाखेच्या आमंत्रणानुसार उपस्थित होते (साहेबांनी कोणालाही फोन केला नव्हता.). शिवसेनेचे झाडून सगळे नेते होतेच, पण माझ्या खास आमंत्रणावरुन भाजपनेते प्रमोद महाजन हेदेखील उपस्थित होते. एलपीची एव्हरग्रीन गाणी लाइव्ह ऐकायला मिळाली. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी केलेलं मंत्रमुग्ध भाषण हा अनमोल ठेवा आहे. कार्यक्रमाची तिकिटे ५०रुपयांपासून ५००रुपयांपर्यंत होती. अलोट गर्दीत, पण अतिशय शिस्तीत कार्यक्रम पार पडला. तेव्हा छगन भुजबळ दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर होते, तर मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. भाजपशी तेव्हा अगदी गूळपीठ नव्हतं, तरी माझ्या आग्रहास्तव प्रमोद महाजन उपस्थित होते. या नेत्रदीपक सोहळ्यानंतर बाळासाहेब, माँसाहेब मीनाताई, सर, भुजबळ, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे आदींना मुलुंडच्या सितारा रेस्टॉरंटमध्ये मेजवानीसाठी (सेलिब्रेशनसाठी) घेऊन गेलो. या सर्वांची सिताराच्या कॉन्फरन्स रुममध्ये बसण्याची खास सोय केली होती. सर्व नेतेमंडळींना त्यांच्या आवडीची खास पेये सर्व्ह केली. बाळासाहेबांच्या मैफलीत सर्व नेते मंडळींना दिलखुलासपणे खानपान करण्याची मुभा असायची. बाळासाहेबांना तिखट मुळीच चालत नसे. त्यांच्यासाठी खास डिशेस तयार केल्या होत्या. माँसाहेब व नेत्यांची पूर्ण प्रभावळ होती. मेजवानीच्या सुरुवातीला चीअर्स होताच बाळासाहेबांनी मला हाक मारली. साहेबांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘शिशिर, फारच जबरदस्त कार्यक्रम केलास. केवढा भव्य कार्यक्रम केलास. तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या जवळ ये. माझ्या छातीवर डोकं ठेव.मी भारावून नमस्कारासाठी वाकलो आणि साहेबांनी माझं डोकं त्यांच्या छातीला काही क्षण लावून घेतले. माझे डोळे भरुन आले. आनंदाश्रू अनावर झाले. हा रोमांचकारी प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला गेला. शेवटचा श्वास असेपर्यंत मी या आठवणी विसरु शकणार नाही. रात्री साडे अकराला सुरु झालेली ही रंगतदार पार्टी पहाटे दोनच्या सुमारास संपली. साहेब निघाले. निघताना त्यांनी बजावलं, ‘तुझी व शिवसैनिकांची खूप मेहनत झालीय. आता जागू नका. लगेचच जेवण कर आणि घरी जाऊन संध्याकाळपर्यंत ताणून दे. साहेब म्हणजे खट्याळपणा! गाडीत बसताना म्हणाले, ‘कार्यक्रमास सर्व तुताऱ्याच (नट) होत्या. पण हॉर्न एकही नव्हता (नटी). एवढी मात्र चूक केलीस!