शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

स्मृती एका झंझावाताच्या…

शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱया परळ येथील के.ई.एम. रूग्णालयात शिक्षण आणि वैदय़कीय सेवा देणारे डॉ. रवी बापट संघटना ते राजकारण हा मराठी माणसाच्या भल्याचा कैवार घेणाऱया पक्षाचा प्रवास अन् बाळासाहेबांचा करिष्मा अगदी सहजपणे उलगडून दाखवतात.  शब्दांकन- निलेश अहिरे

2000 साली कम्युनिस्ट चळवळीतला असूनही शिवसैनिकांनी अगदी आग्रह करून माझ्या हस्ते शिवसेनेच्या परळ शाखेचे उद्घाटन करून घेतले. त्यानंतर बाळासाहेब नेहमी म्हणायचे हा बापट आपल्या शिवसैनिकांवर उपचार करतो, त्यांची मदत करतो, आपल्या कार्यक्रमांत सहभागी होतो, मग आपल्याकडे येत का नाही?
तो काळंच अत्यंत भारावलेला होता… आताची बंद दाराआड राहून मूग गिळून गप्प बसणाऱयांची संस्कृती तेव्हा नव्हती… अन्याय, अत्याचाराविरूद्ध आवाज उठवणारी… आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पेटून उठणारी… चळवळ  करणारी पिढी त्याकाळी महाराष्ट्राच्या घराघरांत वाढत होती… आपल्या प्राणांची बाजी लावून मुंबईसह `संयुक्त महाराष्ट्रा’चे स्वप्न साकार करण्यात या पिढीचा फार मोलाचा वाटा आहे.
 मुंबईसह `संयुक्त महाराष्ट्र’ लढय़ाच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरश: पेटलेला होता. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट, प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी आणि कॉंग्रेसेतरांनी मिळून `संयुक्त महाराष्ट्रा’चा लढा हाती घेतला होता. सेनापती बापट, एस.एम. जोशी, प्र.के. अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख आणि प्रबोधनकार ठाकरे असे मातब्बर नेते या लढय़ाचे विविध टप्प्यावर नेतृत्व करत होते. चळवळीच्या माध्यमातून सत्ताधाऱयांना कडवी झुंज देऊन चारी मुंडय़ा चीत केल्यानंतर अखेर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचा `मंगलकलश’ मराठी बांधवांच्या हाती आला. `संयुक्त महाराष्ट्र समिती’चे उद्दीष्टय़ पूर्ण झाले होते. काळ हळुहळू पुढे सरकत होता…
 सन 1957 मध्ये मी मध्य प्रांतातून मुंबईत शिक्षणाच्या निमित्ताने दाखल झालो होतो व पुढे डॉक्टर झाल्यानंतर 1959 मध्ये परळच्या के.ई.एम. हॉस्पिटल व जी.एस. मेडिकल कॉलेजात रूजू झालो. शिवसेनेची चळवळ जिथे फोफावली, वाढली त्याचा केंद्रबिंदू परळ, लालबाग असल्याने मला हा सारा अनुभव अत्यंत जवळून घेता आला.
मराठी बहुभाषिकांचे राज्य अस्तित्त्वात आले होते खरे, पण या राज्यात मराठी लोकांसाठी, खासकरून तरूणांसाठी कुठलाही ठोस व कृतिशिल कार्यक्रम राबवला जात नव्हता. राज्यात कॉंग्रेस सोडल्यास कामगारांच्या हक्कांसाठी झगडत कारखानदार आणि सत्ताधाऱयांना जेरीस आणणारा कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षच काय तो संघटीतपणे कार्यरत होता, परंतु हे पक्षही तरूणांना दिशा देण्यात कमी पडत होते. मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्र समितीची सत्ता होती. त्यात कम्युनिस्ट आणि समाजवादी हे घटक पक्षही होते, मात्र एकमेकांच्या उखाळय़ा पाखाळय़ा काढण्यातच हे पक्ष मश्गुल असल्याने तरूणांच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते. तरूणांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यातली अस्वस्थता दिवसागणिक वाढत होती.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अवघ्या तीनच महिन्यात सुरू झालेल्या `मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकामधून व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी समाजातली अन् तरूणांच्या मनातली हीच अस्वस्थता टिपायला सुरूवात केली. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱयातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम बाळ ठाकरे करत होते. त्याला लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागला. त्यांच्या भोवती मराठी तरूणांची गर्दी जमायला लागली होती. मराठीच्या मुद्दय़ावर भूमिपुत्रांठी कायमस्वरूपी लढणारी एखादी संघटना असावी असा विचार पुढे येऊ लागला. बाळासाहेंबाकडे धमक होती, नेतृत्व करण्याची क्षमता होती, तरूणांना आकर्षित करणारी आणि त्यांच्यात जोश फुंकणारी ज्वलजहाल वाणी होती तसेच व्यंगचित्रकार असल्याने समाजातले-राजकारणातले व्यंग अचूकपणे टिपण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे होते.
मराठी बांधवांच्या असंतोषाचा ज्वालामुखी आतल्या आत धगधगत होता, त्याला येनकेन प्रकारे बाहेर पडायचेच होते… महाराष्ट्राच्या राजकीय आसमंतात एकप्रकारची पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी कोणाला तरी भरून काढायचीच होती… त्यासाठी हिच वेळ योग्य होती. मराठी बांधवांच्या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी अन् कम्युनिस्ट पक्षाला मुळापासून उखडून काढण्यासाठी सत्ताधारी पक्ष तसेच काही अदृष्य शक्तींनी एकत्र येऊन चळवळीला सुरूवात करून दिली. चळवळीचा केंद्रबिंदू `मराठी माणूस’ ठरवण्यात आला व या चळवळीचे नेतृत्व अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती आले. चळवळीचे वारे जोरदारपणे वाहत होते. बाळासाहेबांनी बी.के. देसाई, माधव देशपांडे, श्याम देशमुख या शिलेदारांना हाताशी घेत नेतृत्वाची धुरा सांभाळली. आपल्या खणखणीत भाषणांद्वारे आणि `मार्मिक’मधल्या व्यंगचित्रांद्वारे बाळासाहेबांनी या वाऱयाला झंझावाताचे स्वरूप प्राप्त करून देत सत्ताधाऱयांना `फटकारे’ मारायला सुरूवात केली. बाळासाहेबांच्या मागे दिशाहीन असलेला तरूणवर्ग एकवटायला लागला…
पुढे शिवसेनेची स्थापना कशी झाली हा इतिहास तर सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु सांगण्याचा मुद्दा हा की, वर नमूद केलेल्या परिस्थितीने बाळासाहेबांसारख्या मनस्वी कलावंताला राजकारणात पडण्यास उदय़ुक्त केले. बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा लाभलेला होता. संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ त्यांनी स्वत: अनुभवली होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर समाजात आणि राजकारणात निर्माण झालेल्या अनागोंदीतील व्यंग त्यांना न दिसते तरच नवल.
बाळासाहेबांनी मराठी तरूणांची मोट बांधताना ते कुठल्या जाती -धर्माचे, कुठल्या आर्थिक स्तरातील आहे हे न बघता केवळ त्यांच्यातील तडफ, नेतृत्व करण्याची क्षमता आणि वत्कृत्व गुण हेरून त्यांना संघटनेत नेतृत्वाची संधी दिली. यातूनच डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडीक यांच्यासारखे नेते उदयास आले. संघटनेला चेहरा प्राप्त करून देतानाच मराठी मनातली धुसमुस बाहेर काढण्यासाठी प्रबोधनकारांचे विचार आणि अत्र्यांसारख्या धारदार पण सामान्य लोकांना कळेल-भिडेल अशा भाषणशैलीचा वापर करत त्यांनी साऱया तरूणवर्गाला चेतवले, `हटाव लुंगी, बजाव पुंगी’ सारख्या घोषणा देत एकामागोमाग एक करत दक्षिणात्य, कम्युनिस्ट आणि शेटजींविरूद्ध आघाडय़ा उघडल्या.
ही सगळी धामधुम सुरू असताना मी मात्र कम्युनिस्ट चळवळीकडे ओढला गेलो होतो. विरूद्ध पार्टीतला असल्यामुळे सहाजिकच त्यावेळी शिवसैनिकांच्या रोषाचा मला सामना करावा लागायचा. मला आणि माझ्या सहकाऱयांना लाल माकडं म्हणूनही तेव्हा ते हिणवायचे. मारामाऱया, तोडाफोडीचे सत्र ऐन रंगात असताना बहुतेक जखमी शिवसैनिकांचे टोळकेच्या टोळके उपचारांसाठी के.ई.एम.मध्ये येऊन दाखल व्हायचे. डॉक्टर या नात्याने मीही त्यांच्यावर आत्मियतेने उपचार करायचो. यातूनच पुढे मी कम्युनिस्ट विचारसरणीचा असलो, तरी शिवसैनिकांच्या मनात माझ्याविषयी आदरभाव निर्माण होत गेला. त्यानंतर शिवसेनेचा कुठलाही साधा शिवसैनिक असो वा महत्वाच्या पदावरचा नेता त्याच्या उपचारासंबंधी सर्वात पहिला फोन मलाच यायचा…
केवळ हाणामाऱयांतून मराठी तरूणांच्या मनातली धग बाहेर काढण्यास शिवसेनेने वाट करून दिली म्हणून तरूणवर्ग शिवसेनेकडे आकर्षित झाला असे नव्हते, तर शिवसेनेने तरूणांच्या नोकरी-धंदय़ाचा प्रश्न उपस्थित करून `स्थानीय लोकाधिकार समिती’द्वारे हा प्रश्न सोडवण्याचा यशस्वी प्रयत्नही त्याकाळी केला होता. अनेक सुशिक्षीत तरूणांना `स्थानीय लोकाधिकार समिती’च्या माध्यमातून शिवसेनेने रिझर्व्हं बॅंक, एअर इंडिया, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा वगैरेंसारख्या ठिकाणी नोकऱया मिळवून दिल्या. विविध बॅंका आणि खाजगी आस्थापनांमध्ये मराठी तरूणांचा टक्का वाढवण्यात शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली होती. खेळाडूंना विशेषकरून कबड्डी/खो खो खेळणाऱयांना नोकऱया मिळवून देण्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. एवढेच नव्हे, तर अशिक्षीत-अकुशल तरूणांसाठी त्यांनी `वडापाव’च्या गाडय़ांचा अभिनव प्रयोगही राबवला.
फुकाचा राजकीय आणि सामाजिक विचार देत न बसता तरूणांना अर्थप्राप्ती करून देण्यावर बाळासाहेबांनी भर दिल्यामुळे शिवसेना मराठी कष्टकऱयांच्या घराघरांत शिरू शकली. जिथे मराठी तरूणांना हिणवले जायचे तिथेच बाळासाहेबांनी गिरणगावांतल्या मराठी माणसाला वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मग तो कुठल्याही व्यवसाय-धंदय़ातला असला, तरी बाळासाहेबांनी त्याला खंबीरपणे पाठिंबा दिला व पक्षासाठी त्यांचाही योग्य प्रकारे उपयोग करून घेतला. शिवसेनेने तरूणांच्या मनाचा इतका ठाव घेतला की, एकाच घरात वडील कॉ. डांगेंचे अनुयायी आणि मुले बाळासाहेबांचे; अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच ऋणानुबंध तयार झाला होता तो त्यांच्या पारदर्शी स्वभावामुळे. एखादी गोष्ट मनाला पटली की सामाजिक आणि राजकीय मतांची पर्वा न करता ते त्याला पाठिंबा देत. बोफोर्स घोटाळय़ात सापडलेल्या अमिताभलाही त्यांनी याचप्रकारे पाठिंबा दिला होता. शिवसैनिकांवर बाळासाहेब अतोनात प्रेम करायचे. त्यांच्या लहानसहान प्रश्नांमध्ये जातीने लक्ष दय़ायचे. खरं तर शिवसेना आणि शिवसैनिक यांना जोडणारा महत्वाचा दुवा एकमेव बाळासाहेबच होते. जुन्या पिढीतल्या शिवसैनिकांना `मातोश्री’ म्हणजे आपले माहेरच वाटायचे. बाळासाहेबांच्या बरोबरीनेच मीनाताई ठाकरे यांचा वाटाही मोलाचा होता. घरी आलेल्या शिवसैनिकांचे त्या अगदी मनापासून आगत-स्वागत करायच्या. त्यांची आपुलकीने चौकशी करायच्या. त्यांना काय हवे नको ते बघायच्या. बाळासाहेब आणि मीना वहिनींनी आपल्या तरल व मनस्वी स्वभावाच्या जोरावर असंख्य शिवसैनिकांत जिव्हाळय़ाचे नाते निर्माण केले होते. के.ई.एम.मध्ये कोणीही ओळखीची व्यक्ती ऍडमीट असेल तर त्या मला आवर्जून फोन करून पेशंटची काळजी घ्यायला सांगायच्या.
बाळासाहेबांच्या स्वभावातला मोकळेपणा मला अनुभवायला मिळाला तो त्यांच्यावर केलेल्या उपचारांदरम्यान. यांच काळात बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायची संधी मला मिळाली. साधारण 1983 मध्ये बाळासाहेब तब्बल पाच आठवडे आजारी होते. त्यांच्या आजारपणामुळे शिवसेनेतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा शिवसेनेचे परळमधील नगरसेवक विजय गावकर माझ्याकडे आले व बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती देऊन त्यांना तपासणार का म्हणून मला विचारले. मी तात्काळ हो म्हटले व त्यांची इच्छा असेल, तर लगेच जाऊया म्हणालो. त्यानंतर मी बाळासाहेबांना तपासले, त्यांच्या आजाराचे निदान केले. एवढा मोठा नेता असूनही स्वत:च्या आजाराबाबत कुठलीही गुप्तता न पाळता त्यांनी मला अगदी खुल्लम खुल्ला सर्व माहिती दिली. उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांनी मला सहकुटुंब मातोश्रीवर पावभाजी खाण्याचे आमंत्रण दिले होते.
शिवसेनेचे नेते असोत वा ठाकरे कुटुंबियांतील कुठलीही व्यक्ती उपचारांसाठी अत्यंत विश्वासाने सर्वात प्रथम के.ई.एम. सारख्या महापालिका रूग्णालयात यायची. सामान्य लोक व राजकारणातल्या वरच्या स्तरातल्या माणसांमधली दरी कमी होण्यास यामुळे कुठेतरी मदत व्हायची. लोकांना ती आपल्यातलीच एक वाटायची. पंचतारांकित रूग्णालयांच्या आगमनानंतर मात्र हे चित्र बदलले आणि शिवसेनेच्या हाती सत्ता असूनही पुढे महापालिका रूग्णालयांना अवकळा आली.  
शिवसेनेने मराठी माणसाला आणि मराठी माणसाने शिवसेनेला नेहमीच आधार दिला. पण काळ बदलत होता… पूर्वी म्हणजेच 1966 ते 80 दरम्यानच्या काळात शिवसैनिक स्वत:च्या खिशातून पैसे काढून भिंती रंगवत असत. 1980 मध्ये मुंबई महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर पायी चालणारा शिवसेनेचा नेता गाडय़ांमधून फिरू लागला. 1995 नंतर त्यांच्याकडे इम्पोर्टेड गाडय़ा आल्या. छोटय़ा छोटय़ा कामांसाठीही कार्यकर्ते हात पुढे करू लागले. यांतून नेत्यांमध्ये आणि सामान्य शिवसैनिकांमध्ये अंतर निर्माण झाले. मनातून दुखावला असला, तरी कडवट शिवसैनिक केवळ बाळासाहेबांच्या प्रेमाखातर शिवसेनेशी एकनिष्ठ राहीला होता. आता बाळासाहेब आपल्यात नाहीत…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा