बुधवार, ४ फेब्रुवारी, २०१५

गिर्यारोहकांचा विरोध डावलून रायगडावर रोप वे बांधणारे बाळासाहेब…

response.lokprabha@expressindia.com
गिर्यारोहकांचा विरोध डावलून रायगडावर रोप वे बांधणारे बाळासाहेब.. आणि तेच गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करून आल्यावर त्यांचा मोठा सत्कार करणारे बाळासाहेब..

व्यंगचित्रकार, राजकारणी, वक्ते, मित्र.. वेगवेगळ्या लोकांच्या बोलण्यामधून, लिहिण्यामधून बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेकविध पैलूंचे, आठवणींचे दर्शन सध्या होते आहे. त्यातून दिसणारे या एकाच माणसाचे इतके पैलू, त्याच्या स्वभावाचे इतके बारकावे थक्क करायला लावणारे आहेत. आम्हाला गिर्यारोहणाच्या क्षेत्रात असणाऱ्यांनाही त्यांचे असे टोकाचे दोन पैलू पाहायला मिळाले की हाच का तो माणूस असावा का याचे आश्चर्य वाटावे. बाळासाहेब ठाकरे त्यांना न पटलेल्या एखाद्या मुद्दय़ावरून विरोध करायचे तेव्हा तो विरोध टोकाचा असायचा. पण हा विरोध तात्कालिक मुद्दय़ासाठी असायचा व्यक्तीसाठी नाही. त्यानंतर ते विरोध केलेल्या व्यक्तीचंदेखील कौतुक करायचे. प्रसंग होता ‘रायगड रोप वे’च्या बांधणीच्या वेळचा. बाळासाहेबांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पुढे आला होता. आम्हा गिर्यारोहकांचा त्याला विरोध होता. शिवप्रतिष्ठानचादेखील विरोध होता. आमचे म्हणणे असे होते की रोप वे झाला तर कोणीही गडावर जाईल, िधगाणा होईल, पिकनिक स्पॉट बनेल. गड पाहायचा तर तो डोंगर चढूनच जायला हवे, तेव्हा खरा किल्ला कळेल. किल्ले हे चढायला कष्टप्रदच असावेत, तरच इतिहास नीट समजू शकतो. पिकनिक स्पॉट होण्याइतका कोणताही किल्ला वर जायला सोपा होऊ नये, अशी आमची भूमिका होती. साबीरभाई शेख तेव्हा महासंघाचे अध्यक्ष होते. ते कट्टर शिवसनिक व सेनेतले पदाधिकारीदेखील होते. त्यांची खरे तर दोन्ही बाजूंनी अडचण होत होती. त्यांची बाळासाहेबांनी कदाचित कानउघाडणीदेखील केली असावी. गिर्यारोहकांच्या या सर्व हालचाली बाळासाहेबांना कळत होत्या. बाळासाहेब याबाबत आम्हाला थेट कधीच बोलले नाहीत पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. अपंग, वृद्धांना गड पाहता यावा, शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेता यावे या उद्देशाने रोप वे झालाच पाहिजे असे त्यांचे मत होते. उद्या माझ्यासारख्या कोणाला जर गडावर जायचे असेल तर त्याने काय कोणाच्या खांद्यावर बसून जायचे का, असे ते म्हणत. शेवटी त्यांनी रोप वे बांधलाच. पुढे गिर्यारोहकांचा विरोधदेखील कमी झाला. प्रसंग तसा विस्मृतीत गेलेला. १९९८ साली आम्ही महासंघाच्या माध्यमातून एव्हरेस्ट मोहिमेची तयारी सुरू होती. मी तेव्हा मोहिमेच्या मदतीसाठी त्यांना भेटायला गेलो. त्यांची हृदय शस्त्रक्रिया नुकतीच झाली होती. मला पाहून बाळासाहेब सोबतच्या लोकांना म्हणाले, ‘‘आम्ही अपंग, वृद्धांची सोय म्हणून रोप वे बांधत होतो. हे लोक विरोध करत होते. यांना आडवा करून मी रोप वे बांधलाच.’’ इतरही बोलणं झालं आणि एव्हरेस्टविषयी बघतो असे त्यांनी आम्हाला सांगितले आणि ती भेट संपली. पण बाळासाहेब असे भेटणाऱ्यांना विसरत नसत.
मे १९९८ मध्ये आम्ही एव्हरेस्ट सर केला. भारतातून यशस्वी झालेली ती पहिलीच नागरी मोहीम होती. तेव्हा युतीचे सरकार होते. बाळासाहेबांनी नवलकरांना आदेश दिला, या पोरांचा उभ्या भारतात कोणी केला नाही असा सत्कार झाला पाहिजे. मग संपूर्ण शासन हलले. रंगभवनमध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी भव्य सेट उभा केला. स्टेजला लागूनच त्यांनी चक्क एव्हरेस्टची प्रतिकृतीच उभी केली. त्यावर छोटे स्टेज बनवले. तेथे आम्ही बसलो होतो. त्या एव्हरेस्टवर बाळासाहेब आम्हा सर्वाचा सत्कार करणार होते. राज्याचे सारे मंत्रिमंडळ पहिल्या रांगेत होते, आयत्या वेळी बाळासाहेब येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. हा केवळ हारतुऱ्यांचा सत्कार नव्हता. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी आधी आश्वासन दिलेली पंचवीस लाखांची मदतदेखील त्याच कार्यक्रमात देण्यात आली. हे सारे बाळासाहेबांच्या आदेशामुळे झाले होते. आम्हाला आडवे करायला निघाले होते तेच बाळासाहेब आमचा सत्कार करायलादेखील तितकेच उत्साही कसे, हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही.
ते सोडवण्यापेक्षा त्यांचा विरोध आणि त्यांचं प्रेम या दोन्हीच्या ऋणातच राहावं हे उत्तम. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा