बुधवार, १४ जानेवारी, २०१५

भाग २३ : प्रजा समाजवादी पक्ष




भाग २३ : प्रजा समाजवादी पक्ष
शिवसेनीची पहिली युती झाली ती प्रजा समाजवादी पक्षाशी. या पक्षाबाबत फारसं लिहिलं, बोललं गेलेलं नाही. आता स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या या पक्षाचा त्यावेळी मुंबईत चांगलाच प्रभाव होता. पीएसपी किंवा प्रसोपा नावानं हा राष्ट्रीय पक्ष प्रसिद्ध होता.


मुंबईत वरळीच्या रेडीमनी मेन्शन’ बिल्डिंगमध्ये १९३४मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी नावानं या पक्षाचं बारसं झालं. त्याची बीजं रोवली गेली होती, नाशिक जेलमध्ये. स्वातंत्र्य चळवळीतले जयप्रकाश नारायणअशोक मेहता, सुसुफ मेहेर अली, आदी काँग्रेस नेत्यांनी जेलमध्येच स्वतंत्र पक्ष स्थापण्याचा विचार केला. स्वातंत्र्यानंतरचा समाज कसा असेल, हे ठरवण्यासाठी त्यांनी काँग्रेसमध्येच दबावगट तयार केला होता. पण या गटाला वल्लभभाई पटेलादी नेत्यांनी विरोध केला. त्यातूनच मग स्वतंत्र काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचा जन्म झाला. 

१९४८मध्ये या पार्टीचे मुंबई महापालिकेत ३६ सदस्यही निवडून आले. मुंबईतल्या तरुणांमध्ये तेव्हा या पार्टीचं वारं होतं. म्हणजे आईवडील काँग्रेसमध्ये आणि पोरं काँग्रेस सोशलिस्ट पार्टीत, असा प्रकार होता.

१९४२ची चळवळ पक्षाच्या जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, डॉ. लोहिया, अरुणा असफ अली यांनी गाजवली. स्वातंत्र्य मिळाल्यावर अखेर या नेत्यांनी १९४८मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली.

काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून आचार्य कृपलानी यांनी केएमपीपी अर्थात किसान मजदूर पार्टी स्थापन केली. नंतर त्यांनी १९५३मध्ये मुंबईतच केएमपीपी आणि समाजवादी पार्टीचं विलिनीकरण केलं. आणि जन्माला आली, प्रजा समाजवादी पक्ष.
हा पक्षही १९७७मध्ये प्रजा समाजवादी पक्ष जयप्रकाश नारायणांच्या जनता पार्टीत विलीन झाला.
  
खरं तर समाजवाद्यांचं कम्युनिस्टांशी वैर १९३४ पासूनचं. काँग्रेस पक्ष भांडवलदारांचा आहे, असं कम्युनिस्टांचं मत. तर काँग्रेस स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचं एक हत्यार असल्याचं समाजवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं. 
मुंबईतले ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जी. जी. पारिख सांगतात, ‘‘१९४२च्या चळवळीतही कम्युनिस्ट ब्रिटीशांच्या बाजूने होते. भूमिगत समाजवाद्यांना पकडून देत होते. त्यामुळंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही कम्युनिस्टांसोबत राहणं पक्षश्रेष्ठींना मान्य नव्हतं.’’

अर्थात पुढं १९६८च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करून प्रसोपानं कम्युनिस्टाचं उट्टं काढलंच. पुढं शिवसेना मुस्लिम विरोधी आणि हिंदुत्ववादी झाल्यानंतर ही युतीही तुटली.
त्यापूर्वी प्रजा समाजवादी आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन संयुक्त समाजवादी पक्ष तयार झाला होता. डॉ. लोहिया, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिंस हे या पक्षाचे प्रमुख नेते होते.

प्रजा समाजवादी पक्षाने मुंबईत पहिल्यांदा गृहनिर्माण सहकारी चळवळ सुरू केली. त्यातून जुन्या चाळींचा पुनर्विकास सुरू झाला. झोपडपट्टीत राहणा-या गरिबांचे जीवनमान सुधारावे, फेरीवाल्यांना परवाने मिळावेत यासाठी हा पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहिला.

त्यांनी सुरू केलेल्या ग्राहक चळवळीतून अपना बाजार, अपना बँक, न्यू इंडिया को. ऑप. बँक, अंबुजा को. ऑप. बँक स्थापन झाल्या.

पारिख म्हणतात, ‘‘सध्या आम्ही पाठपुरावा केलेल्या सुनियोजित शहर संकल्पनेकडं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. चाळी, झोपडपट्ट्या मुंबईत टॉवर उभे राहतायत. गरीब, मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जातोय. मराठी माणसांचा कैवार घेणा-या शिवसेना, मनसेसारख्या पक्षांचंही त्याकडं दुर्लक्ष आहे.’’

असं मराठीप्रेम केवळ समाजवाद्यांनाच होतं, असं नाही. १९६८च्या निवडणुकीत तर सर्वच पक्षांना मराठी प्रेमाचं भरतं आलं होतं. त्याविषयी पुढच्या भागात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा