मंगळवार, २० जानेवारी, २०१५

आणिबाणी जाहीर करा- शिवसेनाप्रमुख

देशात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला दहशतवाद, मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर सरकार या साऱ्या घटना रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत, देशात आणिबाणी जाहीर करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनातून केली आहे.
मुंबईत झालेला हल्ला हा देशावर झालेला हल्ला असून, यात अनेकांचे प्राण गेले. केंद्र सरकार हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरले असून, नाकरत्या सरकारने पायऊतार व्हावे अशी मागणी बाळासाहेबांनी केली आहे.
इराकमध्ये बुशला मारलेला जोडा हा त्या जनतेचा स्वाभीमान असून, इराकी जनतेला त्याचा अभिमान असल्याचे सांगत देशाबद्दल आपल्याला अभिमान नसल्याची खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ज्वलंत मुलाखतीतून व्यक्त केली आहे.
आपला हा संन्यास राजकीय संन्यास या अर्थाने घेऊ नका हा सर्वार्थाने संन्यास आहे. सार्‍या घाणेरड्या गोष्टींतून अलिप्त रहाण्यासाठी आपण हा संन्यास स्वीकारल्याचे त्यांनी यात म्हटले असून, आपल्याला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही बंधनात ठेवले नाही. आणि आपल्याला नजर कैदेत वगेरे ठेवण्याची हिंमत कोणात आहे का असा प्रश्‍न त्यांनी या मुलाखतीतून व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात केवळ शिवसैनिकांच्या प्रेमाखातर आपण आलो होतो. आपल्या हातात काठी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण ही काठी आपण महाराष्ट्राच्या आधारासाठीच घेतल्याचे त्यांनी स्पष्‍ट केले आहे.
देशातील राजकीय नेत्यांना मुळीच स्वाभीमान उरला नसून, देशाच्या संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरुची फाशी केवळ मुस्लिम मते मिळवण्यासाठी रोखण्‍यात आल्याचा आरोपही बाळासाहेबांनी या मुलाखतीत केला आहे.
सलग तीन दिवस दैनिक सामनातून ही मुलाखत प्रसिद्ध करण्‍यात येणार असून, यात बाळासाहेबांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उडवली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा