बुधवार, १४ जानेवारी, २०१५

भाग १९ : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)

भाग १९ : प्रचाराच्या भिंतीघोषणांचा पाऊस (भाग १)
जमाना आहे कोट्यवधी लोकांना एकमेकांशी जोडणा-या सोशल नेटवर्कींगचा. तरुणाई तर ‘ट्विटर’,‘फेसबुकच्या ‘वॉलवर अक्षरशपडीक असते. या तरुणाईला जर एखाद्या वयस्कर गृहस्थांनी सांगितलं, की ‘१९६८ साली मुंबईतल्या तमाम ‘वॉल्सनी अर्थात ख-या खु-या भिंतींनी शिवसेनेला एक निवडणूक जिंकून दिली...’, तर त्यांनी त्यावर विश्वास ठेवावा. कारण तो इतिहास आहे.

ज्ञानदेवमाऊलींनी आळंदीत जशी निर्जीव भिंत चालवली, तशा ७०च्या दशकात मुंबईतल्या भिंती जणू बोलत होत्या. म्हणजे, या भिंतींवर रंगवलेल्या आकर्षक घोषणा लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. त्यांना जागवत होत्या. साद घालत होत्या. आपलं म्हणणं लोकांपर्यंत थोडक्यात आणि नेमकंपणानं पोचवण्यासाठी त्यावेळी या भिंतींशिवाय हुकमी पर्याय नव्हता. साहजिकच निवडणूक प्रचारात या भिंतींना फार फार महत्त्व आलं. 

मुंबईत त्या काळात विळा हातोड्यावाल्या कामगार संघटनांची या भिंतींवर मक्तेदारी होती. १९६६नंतर शिवसेनेचा वाघोबा या मक्तेदारीला गुरकावू लागला. पहिला घास होता, यंडुगुंडूंचा. त्यांच्या विरोधातल्या ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ घोषणेनं मुंबईत धुमाकूळ घातला. त्यानंतर नंबर होता, कम्युनिस्टांचा. ‘जला दो जला दो, लाल बावटा जला दो’, या घोषणेनं डाव्यांना धडकी भरवली.

निवडणुकीत तर हे घोषणायुद्ध अगदी भरात आलं. यात शिवसेनेनं एकदमच आघाडी घेतली. कारण शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मूळचे चित्रकार. त्यांच्या व्यंगचित्रांना जनतेनं यापूर्वीही दाद दिली होतीच. शिवाय वडील प्रबोधनकार ठाकरेंकडून वारसापरंपरेनं आलेली ‘एक घाव दोन तुकडेकरणारी भाषाही जोडीला होतीच. त्याचा पुरेपूर वापर शिवसेनेच्या घोषणांमध्ये करण्यात आला.

१९६८च्या निवडणुकीत केवळ भिंतीच नव्हेत तर पूलपाईपपाण्याच्या टाक्या शिवसैनिकांनी ‘ताब्यातघेतल्या. कम्युनिस्ट कार्यकर्ते चुना लावून भिंती बुक करून ठेवत. शिवसैनिक मग या भिंतीच धुवून टाकत. दोघांमधल्या भांडणाची खरी सुरुवात या भिंतींवरूनच झाली. कम्युनिस्ट भिंतींवर आपल्या पक्षाचा शॉर्टफॉर्म ‘सीपीआय’ असा लिहायचे. म्हणून शिवसैनिक ‘एसएस’ असं लिहू लागले.

शिवसेनेच्या घोषणा भावनिक आवाहन करणा-या असायच्या. त्यातल्या त्यात ‘शिवरायांची शपथ तुम्हालाविजयी करा शिवसेनेला’ ही शिवसेनेची आवडती घोषणा होती. तर ‘असशील जर खरा मराठी,राहशील उभा शिवसेनेच्या पाठी’ असं मराठी मनांना भिडणारी घोषणा ठिकठिकाणी दिसू लागली.

लोकप्रिय सिनेमांची नावं लोकांच्या पक्की लक्षात राहतात, हेही शिवसेनेनं लक्षात घेतलं. त्यातूनच मग ‘थांब लक्ष्मी कुंकू लावतेशिवसेनेला मत देऊन येते’, ‘बूँद जो बन गये मोतीशिवसेना हमारा साथी’, या घोषणा रंगवल्या जाऊ लागल्या.

म्हणीवाक्प्रचारसुविचारकाव्य यांचा मुक्त वापर या घोषणांमध्ये केला जाऊ लागला.
बाळासाहेब व्यंगचित्रांमधून जी टोपी उडवायचे, तो प्रकार या घोषणांमध्येही दिसू लागला. 
काँग्रेसला मत म्हणजे चांगल्या नागरी जीवनाला मत’ या घोषणेच्या पुढं शिवसैनिकांनी लिहिलं ‘हा हा हा हा...’ 

केवळ पक्षाच्या भिंती रंगवता रंगवता पेंटर झालेले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात, ‘बाकी काहीही असो या भिंती अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेल्या असत. या सुबकतेचं श्रेय शिवसेनेलाच द्यायला हवं. त्यातून एकप्रकारे भिंतीवाचनाचा आनंद मिळे. अर्थात शिवसेनेला खिजवणा-या घोषणाही विरोधकांनी शोधल्या होत्याच. त्याविषयी पुढच्या भागात. 


भाग २० : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस! (भाग 
शिवसेना मुंबईतल्या मराठी माणसांवर मोहिनी घालू शकली याचं एक मुख्य कारण म्हणजे शिवसेनेची ठाकरी भाषाही भाषा थेट होती. नेमकी होती. एक घाव दोन तुकडे करणारी होती. शिवसेनेच्या घोषणांमध्ये ही भाषा पुरेपूर उतरली. 

कॉम्रेड प्रकाश रेड्डी म्हणतात, ‘गोबेल्स पद्धतीनं प्रचार करून शिवसेनेनं मुंबईकरांना हिप्नॉटाईज केलं.’ ते काहीही असो, ही भाषा लोकांना भिडत होती. याअगोदर अशाच पद्धतीची भाषा वापरून आचार्य अत्र्यांनी महाराष्ट्र गाजवून सोडला होता. बाळासाहेब ठाकरेंनी अत्र्यांवरही कडी केली. 
६७च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र समिती पुरस्कृत ‘पाच पांडवांना निवडून द्या’, असं आवाहन अत्र्यांनी केलं. त्याला विरोध करताना ‘या पंचमहाभुतांना गाडा’, अशी घोषणा बाळासाहेबांनी दिली. त्याही पुढं जाऊन त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा-अत्र्याला पुरता लोळवावा’! अशीही घोषणा देऊन टाकली. सेनेच्या टार्गेटवर असलेले कृष्ण मेनन यांची निशाणी सायकल होती. त्याचा भाषणात उल्लेख करून बाळासाहेब घोषणा द्यायचे,‘सायकल पंक्चर..’ लोक प्रतिसाद द्यायचे, ‘झालीच पाहिजे!..’

याच निवडणुकीत संयुक्त समाजवादी पक्षाची दाणादाण उडाल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस बोंब ठोकत आहेत, असं व्यंगचित्र बाळासाहेबांनी ‘मार्मिकमध्ये काढलं. त्याला घोषणावजा कॅप्शन होती, ‘शिवसेना-प्रसोपा युती, त्याने केली आमची माती...बों बों बों...

शिवसेनेची प्रजा समाजवादी पक्षासोबतची युती नंतर तुटली. त्यानंतर ७१च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी रातोरात दादर भागात  ‘प्रमिला दंडवते,सर्वांना गंडवते’, अशा घोषणा रंगवल्या होत्या.
जनताचे शांती पटेलकाँग्रेसचे रजनी पटेलमराठी मनाला हे कसे पटेलअशा अत्रेंच्या स्टाईलची आठवण करून देणा-या मुबलक घोषणा शिवसेनेनं तयार केल्या होत्या.

अर्थात शिवसेनेला उत्तर देणा-या घोषणा विरोधकांनी शोधल्या होत्याच.

बजाव पुंगीहटाव लुंगी’ या घोषणेला गिरणगावातल्या कम्युनिस्टांनी ‘धोती लुंगी एक हैटाटा बिर्ला दुष्मन है’ या घोषणेनं उत्तर दिलं. तर ७१मध्ये करिअप्पा यांची प्रचार मोहीम खांद्यावर घेतल्यावर, मराठी माणसाच्या मारतात गप्पानिवडून आणतात करिअप्पा’ या घोषणेनं शिवसेनेला खिजवलं गेलं होतं.

शिवसेनेकडं सुरुवातीला ढाल-तलवार चिन्ह होतं. त्यावेळी ‘जय अंबे जय भवानी, ढाल तलवार आमची निशाणी’ अशी घोषणा होती. धनुष्य-बाणाचं चिन्ह मिळालं तेव्हा ‘आमची निशाणी धनुष्य बाण, विरोधकांची दाणादाण’ ही घोषणा जन्माला आली. सर्वसामान्यांच्या लक्षात राहील, असा ‘पंच’ या घोषणांमध्ये असे. अगदी अजूनही ‘आवाज कुणाsचा..’ म्हटलं कीपुढचं ‘शिवसेनेsचा..’ हे आपोआप ओठांवर येतंच!

खरं तर ‘प्रांतवाद उभी करणारी संघटना’ म्हणून त्यावेळी शिवसेनेच्या बाजूनं मीडिया फारसा नव्हता. पण शिवसेनेसाठी प्रभावी मीडियाचं काम या घोषणांनी केलं. त्याला जोड मिळाली ती ‘मार्मिकची. बाळासाहेब ‘मार्मिकमध्ये जी कार्टून्स काढायचे, तीच मोठी करून शिवसैनिक चौकाचौकांत लावायचे. ही कार्टून्स एवढी प्रभावी ठरायची की शिवसेनेला वेगळ्या मीडियाची अशी गरजच भासली नाही.

बाकी काहीही असो शिवसेनेच्या या घोषणांनी तो काळ गाजवला. सुबक अक्षरात लिहिलेल्या घोषणांच्या भिंतींनी कार्यकर्त्यांना आणि मुंबईकरांना एक वेगळाच आनंद दिला.
१९६८च्या निवडणुकीत भिंती रंगवणारे, पोस्टर्स चिकटवणारे असे उत्साही कार्यकर्ते शिवसेनेला भरपूर मिळाले. पण मिळत नव्हते, उमेदवार. त्याविषयी पुढच्या भागात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा