मंगळवार, २० जानेवारी, २०१५

आठवणीतील बाळासाहेब - अमिताभ बच्चन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पहिली भेट कधी झाली हे लक्षात नाही. मात्र माझ्या आठवणीप्रमाणे शक्यतो १९७० सालापासून मी त्यांना ओळखतो. एका कार्यक्रमात त्यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली. ती ओळख अत्यंत औपचारिक स्वरूपाची होती. मात्र अनेक वर्षांनंतरही तो क्षण कायम आठवणीत राहिला. बाळासाहेबांच्या शिवसेनेने अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. भूकंपासारखे राष्ट्रीय संकट असो किंवा महापूर मदतीच्याबाबतीत शिवसेना नेहमीच आघाडीवर राहिली आहे. शिवसेनेने केलेले अत्यंत कौतुकास्पद कार्य माझ्या कायम लक्षात राहील. मुंबईतील फुटपाथवर राहणार्‍या गरीब आणि असहाय नागरिकांसाठी शिवसेनेने पहिल्यांदा फिरते वैद्यकीय केंद्र सुरू केले होते. या मोबाईल ऍम्ब्युलन्सचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यानंतर आमचे नाते वाढतच गेले. काळाच्या ओघात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे कौटुंबिक नाते निर्माण झाले.
बाळासाहेबांबद्दल सांगण्यासारख्या कितीतरी गोष्टी समोर येत आहेत. काय सांगू, काय नको सांगू, प्रश्नच पडलाय. १९८२ साली मनमोहन देसाई यांच्या कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला दुखापत झाली. सेटवर लागलेला हा मार गंभीर स्वरूपाचा होता. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मी मृत्यूशी झुंज देत होतो. त्यावेळी आमच्या कुटुंबियांसोबतच ठाकरे कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्य माझ्याकडे लक्ष देऊन होता. ठाकरे कुटुंबातील सदस्य सतत रुग्णालयात यायचा, त्यांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली. मी बरा झालो यात ठाकरे कुटुंबीयांच्या प्रार्थनेचा सिंहाचा वाटा आहे, यात वादच नाही. त्यांनी नेहमीच मला आपले समजले आहे.
याच काळातील आणखी एक प्रसंग मला लक्षात येतो. बाळासाहेब उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत. मी रुग्णालयात असताना त्यांनी काढलेले एक खास कार्टून मला बाळासाहेबांच्या आणखी जवळ घेऊन गेले. त्यांनी यमराजाचे कार्टून काढले होते. 'ब्रीचकँडी रुग्णालयाच्या जवळपासही फिरकू नको, इथे आलास तर वाईट परिणाम होतील', असा इशारा या कार्टूनमधून यमराजाला देण्यात आला होता. हे व्यंगचित्र बाळासाहेबांच्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे, हेच सिध्द करणारे होते. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एवढे पैलू आहेत की त्याविषयी किती सांगू असा प्रश्न पडतो. मी नव्यानेच राजकारणात आलो होतो.
राजकारणात येणे माझ्या दृष्टीने सर्वात मोठी चूक होती. त्या काळात माझ्या कुटुंबीयांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. तत्कालिन मंत्री व्ही. पी.सिंग यांनी मला विनाकारण बोफोर्स कांडात गुंतवले. वास्तविक पाहता मी राजकारणात नवीन होतो आणि मला काहीच माहिती नव्हते. राजकारण हे पैसे कमावण्याचे साधन कधीच नव्हते. माझे मित्र राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून मी राजकारणात प्रवेश केला. माझ्यावर चोहोबाजूंनी आरोप झाल्याने मी पार खचलो होतो.
जगाला सत्य कसे सांगू या विचारात असतानाच बाळासाहेबांना फोन केला. त्यांनी लगेच मातोश्रीवर बोलावले. त्यांच्या खोलीत त्यांचे पिता प्रबोधनकार ठाकरे यांचे छायाचित्र होते. त्या चित्राकडे बोट कारीत बाळासाहेब म्हणाले, 'माझे वडील मला सांगायचे की, या जगात सत्यापेक्षा मोठे काहीच नाही. आता मला सांग या प्रकरणातील सत्य काय आहे' यावेळी मी त्यांना म्हणालो, 'माझ्यावर विश्वास ठेवा. बोफोर्स कांडात माझा हात नाही. सर्व आरोप निराधार आहेत, बिनबुडाचे आहेत.' हे एकताच माझ्या डोक्यावर हात ठेवून बाळासाहेब म्हणाले जर हेच सत्य आहे तर तुला घाबरायची गरज नाही. निर्भय रहा.
ठाकरे कुटुंबिय नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत आणि कायम राहातील. बाळासाहेबांच्या या दोन वाक्यांनी मला संजीवनी मिळाली. माझे मनोधैर्य वाढले. माझ्या समोर अंधार पसरला होता. शिवसेनाप्रमुखांच्या वाक्याने त्या अंधारात प्रकाशाचे किरण दिसू लागले. त्यांनी धैर्य दिल्यामुळेच मी जगाचा सामना करू शकलो. अन्यथा आरोपांच्या दुष्टचक्रात सापडून मी मृत्यूला कवटाळले असते. खरोखरच त्यांनी मला लढण्याची ताकद दिली. मी निर्भय झालो आणि जे सत्य आहे ते जगाला ठासून सांगितले.
प्रसारमाध्यमे, पत्रकारांना भेटून माझी बाजू मांडली. कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या. अखेरीस सत्याचाच विजय झाला. बोफोर्स कांडात खरे आरोपी अडकले. माझ्यावर जी चिखलफेक झाली होती त्यातून मी बाहेर पडलो. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या काळात बाळासाहेबांनीच मला साथ दिली. बाळासाहेबच नव्हे, त्यांचे संपूर्ण कुटुंबच माझ्यावर मनापासून प्रेम करते. मी पहिल्यांदाच जयासोबत 'मातोश्री' वर गेलो. हा प्रसंग आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. आमचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. जयाचे स्वागत घरातल्या सुनेप्रमाणे झाले. ठाकरे कुटुंबीयांनी जयाला हळदी-कुंकू, फुले आणि नारळ दिले. हा पाहुणचार पाहून मी भारावून गेलो.
बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू मला कायम लक्षात राहातो. ते नेहमीच सत्य बोलतात. जे त्यांच्या जीभेवर असते तेच त्यांच्या मनातही असते. ज्यांना हे सत्य कबूल नसते ते याला चूक असल्याचे सांगितात. बहुतांश लोकं सत्यापासून नाक मुरडतात. मात्र बाळासाहेबांना त्याची पर्वा नाही. बर्‍याचदा त्यांचे बोलणे काळजाला भिडते. अनेकदा ते कटूही वाटते. मात्र ते सदैव सत्यच असते. आज, आत्ता किंवा कधीही त्यांचा एक आदेश आला तर मी त्यांच्यासमोर हजर होईल. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, ते उध्दारकर्ते आहेत. मला तारणारे आहेत. यामुळे मी असं म्हणत नाही तर त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. ज्यांच्याबद्दल मनात आदर असतो, त्यांचा एक आदेशच पुरेसा ठरतो.
बाळासाहेब एक व्यंगचित्रकार आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र एका राजकारण्याच्या अंतरंगात वसलेला हा व्यंगचित्रकार मला अचंबित करतो. आपले जीवन किती कष्टदायक आणि संघर्षदायी आहे. बर्‍याचदा जीवन नीरस वाटते. बाळासाहेबांचे कार्टुन्स त्याला हलके बनवते. त्यांच्या व्यंगचित्रातून मोठा आधार मिळतो. त्यांच्या व्यंगचित्रामध्ये डोकं शांत ठेवण्याची अजब कला आहे. ही कला मी चांगलीच ओळखूनही आहे. बाळासाहेबांशी मैत्री असल्याबद्दल मला अभिमान वाटतो. आमची मैत्री नेहीमच व्यक्तिगत स्वरूपाची राहिली आहे. मी त्यांच्या पक्षासाठी काही करावे, अशी अपेक्षाही त्यांनी केलेली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे आमच्या नात्यामध्ये स्वार्थ व्यक्तिगत हेतूने कधीच आलेला नाही.
बाळासाहेब ठाकरे आमच्या घरी ज्या ज्या वेळी आले, त्या त्या वेळी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच आले आहेत. मीही त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच जातो. कोणाला आमच्या मैत्रीमध्ये काही चूक वाटत असेल तर वाटू द्या. लोकांच्या गैरसमजुतीमुळे आमच्या मैत्रीत खंड पडणार नाही. आमच्यात कौटुंबिक नाते आहे आणि हे कायम ठेवायचे आहे. त्यांचे आणि माझे राजकीय विचार वेगवेगळे असू शकतात. मात्र याचा मैत्रीशी काय संबंध? काहीच नाही. एका व्यक्तीप्रमाणे त्यांच्याशी भेटण्याचा मला जन्मसिध्द अधिकार आहे. या अधिकारावरच मी त्यांच्याशी भेटत असतो, भेटत राहणार. कृपा करून आमच्या मैत्रीचा राजकीय मुद्दा बनवू नका. मी नेहमीच त्यांना भेट असतो. त्यांची मैत्री मी माझे नशीबच समजतो. बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(दै. सामनाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या 'अंगार' या पुस्तकातून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा