मंगळवार, २० जानेवारी, २०१५

राज ठाकरे 'जिना'- बाळासाहेब

ब्रिटीशांनी हिंदुस्‍तानला अस्थिर करण्‍यासाठी मोहम्मद अली जिनांच्‍या डोक्यात विष कालवून माथेफिरू बनविले आणि त्‍याच माथेफिरूच्‍या हाती कु-हाड देऊन हिंदुस्‍तानचे दोन तुकडे केले. कॉंग्रेसवाले महाराष्‍ट्र आणि मराठी माणसाच्‍या बाबतीत तीच फाळणीची नीती अवलंबित आहे. त्‍यासाठी त्‍यांनी 'मनसे'सारखे अक्करमाशी अवलादीचे पक्ष हाताशी धरून जे गजकर्णी राजकारण चालविले आहे ते मुस्लिम लीग पेक्षाही भयंकर आहे. तिकडे मोहम्मद जिना होता इकडे मात्र धरातलाच 'जिना' आहे, अशी शिवराळ टीका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्‍या मुखपत्र 'सामना'तून राज ठाकरे यांचा नामोल्‍लेख न करता केली आहे.
पक्षाचे मुखपत्र असलेल्‍या 'सामना'च्‍या अग्रलेखात म्हटले आहे, की हिंदु म्हणून जगणे या देशात जसे कुचकामी ठरत आहे तशीच स्थिती महाराष्‍ट्रात 'मराठी' म्हणून जगणा-यांची झाली आहे. आचार्य अत्रे यांच्‍या एका भाषणाचा उल्‍लेख करून त्यांनी म्हटले आहे, की 'मी हिंदू नसून पारशी झालो असतो तर मुंबईचा दहा दिवसांसाठी तरी गव्‍हर्नर झालो असतो. मुसलमान असतो तर मुंबई हायकोर्टाचा सरन्‍यायाधीश किंवा मुंबई विद्यापीठाचा व्‍हाईस चान्‍सलर तरी झालो असतो. मात्र बहुसंख्‍य हिंदू जमातीत जन्‍मल्‍याने माझे अतोनात नुकसान झाले आहे.' ही स्थिती आजही महाराष्‍ट्रासाठी तंतोतंत लागू पडते.
मुंबई सारख्‍या शहरात आज केवळ भांडवलदार आणि झोपडीदादांचे राज्य आहे. मराठी माणसाला कॉंग्रेस पक्षात तर काही स्‍थान राहिलेले नाही. आता ते महाराष्‍ट्रातही राहू नये यासाठी त्‍यांचा डावपेच सुरू आहे. म्हणूनच ते 'मनसे' सारख्‍या अक्करमाशी पक्षांना हाताशी घेऊन गजकर्णी राजकारण करीत आहेत. इंग्रजांनी जिनाच्‍या मदतीने देश तोडला कॉंग्रेसवाले घरातल्‍याच जिनाच्‍या मदतीने मराठी माणूस तोडू इच्छित आहेत, असा आरोपही त्‍यांनी राज ठाकरे यांचा उल्‍लेख न करता लावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा