मंगळवार, २० जानेवारी, २०१५

महानेता

ठाकरे घराणे आणि आक्रमकता यांचा जुना संबंध आहे. परखडपणा, स्पष्टवक्तेपणा आणि दोन घेऊन तर दोन देईन सुद्धा हा आक्रमकपणा हे या घराण्याचे वैशिष्ट्य. केशवराव उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे या परंपरेतील एक. सहाजिकच २३ जानेवारी १९२४ रोजी जन्माला आलेल्या बाळ केशव ठाकरे या त्यांच्या चिरंजीवात हा आक्रमकपणा उतरला नसता तरच नवल. बाळ केशव अर्थात आजचे बाळासाहेब ठाकरे.
आक्रमकपणा, परखडपणा याबरोबरच ठाकरे कुटुंबाला कलेचेही देणे मिळाले होते. म्हणूनच मोठे बंधू बाळासाहेब व्यंगचित्रकलेच्या प्रांतात मुशाफिरी करत असताना धाकटे श्रीकांत संगीताच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत होते. तोच वारसा आता छायाचित्रकलेच्या बाबतीत उद्धवकडे आणि व्यंगचित्राच्या बाबतीत राजकडे आला आहे.
बाळासाहेंबांनी आपल्या करीयरची सुरवात व्यंगचित्रकार म्हणूनच केली होती. १९५० च्या दशकात त्यांनी मुंबईत फ्री प्रेस जनरल या वृत्तपत्रात कार्टुनिस्ट म्हणून काम सुरू केले. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर टीका करणारी त्यांची व्यंगचित्रे न्ययॉर्क टाईम्स या वृत्तपत्राच्या रविवारच्या आवृत्तीतही प्रकाशित झाले. या सोबतच जपानच्या असाई शिंबून या वृत्तपत्राचे कोपरेही बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी सजले. लंडनच्या 'मेसर्स कॅसल्स ऍन्ड कंपनी' या जगप्रसिध्द प्रकाशकातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचा समावेश करण्यात आला. हा बहुमान मिळवणारे ते एकमेव भारतीय कलाकार ठरले.
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवर वॉल्ट डिसने आणि डेविड लो यांचा प्रभाव कायम राहिला. एकदा टाईम्सच्या आर. के. लक्ष्मण यांनी असे म्हटले होते, की बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून कायम राहिले असते तर कदाचित ते माझ्याही पेक्षा मोठे ठरले असते, यातच बाळासाहेबांची महत्ता आली. पण आक्रमकपणा आणि कुणाचे ऐकून घेणार नाही, हा स्थायीभाव असलेल्या बाळासाहेबांचे आणि फ्री प्रेस व्यवस्थापनाचे वाजले. इंदिरांजींच्या एका व्यंगचित्रावरून बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतली आणि फ्री प्रेस सोडले. त्याचवेळी साठच्या दशकात मुंबईतील मराठी माणूस संकटात सापडला होता.
गिरण्या बंद पडू लागल्या, कामगारांच्या अडचणी वाढू लागल्या, भांडवलशाहीने रौद्र रूप घेतले. या परिस्थितीत सर्व सामान्य गिरणी कामगार भरडला जाऊ लागला. या संकटाचा सामना करण्यासाठी १९ जून १९६६ रोजी बाळासाहेबांनी समविचारी सहकार्यांना सोबत घेऊन शिवसेनेची स्थापना केली. गिरणी कामगार आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी गेल्या पाच दशकांपासून शिवसेनेचा लढा सुरू आहे. नंतर त्यात हिंदुत्वाचा मुद्दा समाविष्ट झाला. शिवसेनेच्या धगधगत्या विचारांना वाचा फोडण्यासाठी बाळासाहेबांनी २३ जानेवारी १९८९ रोजी 'सामना' या दैनिकाची सुरूवात केली. बाळासाहेबांचे एखाद्या विषयांवरील मत जाणून घेण्यासाठी सामना विश्वासू माध्यम बनले.
गेल्या चार दशकांपासून शिवसेनाप्रमुख मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब दैवत आहे. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे प्रमाण समजला जातो. त्यांचे विचार म्हणजे मुलूख मैदानी तोफच. सडेतोडपणा आणि स्पष्ट वक्तेपणा म्हणजे काय ही बाळासाहेबांच्या शब्दांतून जाणवते. एखाद्या विषयांवर व्यक्त केलेले मत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. कितीही संकटे आली तरी शिवसेनाप्रमुख आपले मत बदलत नाही. यामुळेच ते अनेकदा अडचणीत सापडले. मात्र दरवेळी ते आपल्या मतांवर ठाम राहिले.
७० च्या दशकांत त्यांनी महाराष्ट्रातील परप्रांतीयांविरूद्ध मोहिम उघडली. या मोहिमेचा सर्वाधिक प्रभाव मुंबईत राहिला. गुजरात गुजराती माणसाचा, तमिळनाडू तमिळी माणसांचा तर महाराष्ट्र मराठी माणसांचाच असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे महाराष्ट्रातील दक्षिण भारतीय शिवसेनेच्या टप्प्यात आले. पुढे दाक्षिणात्य जाऊन उत्तर भारतीय शिवसेनेच्या निशाण्यावर आले. या वरून बाळासाहेब कायम वादाच्या भोवर्‍यात सापडले. २००२ साली शिवसेनाप्रमुखांनी इस्लामी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आत्मघातकी पथके तयार करण्याचे आवाहन केले मात्र यावरून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा