मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, 
शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक, शिवसेनाप्रमुख 
श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जवळजवळ अर्धशतकभर शिवसेना या संघटनेचे 
नेतृत्व केले. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका दीर्घकाळ एखाद्या राजकीय 
पक्षाचे नेतृत्व अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने केले नाही, हे सत्य 
आहे.मा. शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे हुकूमशहा आहेत, असे 
बोलले जात असे. त्यांच्याविषयी अनेक समज-गैरसमज होते. मात्र स्पष्टवक्तेपणा
 हा त्यांचा स्वभाव होता. इतर राजकीय पुढाऱ्यांप्रमाणे त्यांनी खोटा मुखवटा
 चेहऱ्यावर कधी चढवला नाही. जिथे अन्याय झाला असेल तिथे तिखट प्रतिक्रिया 
ते व्यक्त करीत असत.विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून महाराष्ट्राच्या 
सामाजिक पुनर्घटनेच्या कार्यक्षेत्रात प्रबोधनकारांचे वादळी 
व्यक्तिमत्त्व सतत गाजत राहिले. त्यांचे लिखाण नेहमीच वादग्रस्त ठरले. 
सामाजिक आणि समतेच्या लढ्यासाठी उभा महाराष्ट्र प्रबोधनकारांनी पायी तुडवला
 होता. संसाराचा गाडा कष्टाने हाकला जात होता, परंतु प्रबोधनकारांच्या 
पत्नीने रमाबाईनी कधीही हूं की चू केले नाही. प्रबोधनकारांना पहिल्या पाच 
मुली झाल्या, परंतु प्रबोधनकारांच्या चेहऱ्यावर निराशेची रेघ कधीच दिसली 
नाही. रमाबाई मात्र मनातून खचल्या होत्या. प्रबोधनकारांसमवेत रमाबाईनी नवस 
बोलला, ‘आई जगदंबे, या वेळी आम्हाला मुलगा दे, त्याला तुझ्या ओटीत टाकीन.’ 
प्रबोधनकारांची त्याच वेळी ‘प्रबोधन’ पाक्षिकाची न्यायालयीन लढाई सुरू झाली
 होती. पण आई जगदंबेने रमाबाईंचा नवस ऐकला. तो दिवस म्हणजे २३ जानेवारी 
१९२७ हा होय. ज्या दिवशी बाळाचा जन्म झाला, त्याच सुमारास प्रबोधनकारांचे 
‘शनी माहात्म्य’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते.धडपड्या स्वभावामुळे 
प्रबोधनकार एका ठिकाणी स्वस्थ बसणे शक्य नव्हते. कर्जतवरून त्यांनी पुन्हा 
पुण्यास कुटुंब हलविले. प्रबोधनकारांची नाटक कंपनी पुण्याहून धुळ्यास गेली 
असता कुटुंबदेखील तिथे गेले. पहिली व दुसरी इयत्ता बाळासाहेबांनी धुळ्यासच 
पूर्ण केली. नंतर भिवंडीस प्रबोधनकार काही वर्षे राहिले. दिवसामागून दिवस 
चालले होते. बाळ वाढत होते. तरी अजून बाळाचे बारसे झाले नव्हते. रमाबाईच्या
 मनातील चुळबूळ प्रबोधनकारांनी जाणली. त्यांनी तात्काळ नाव ठेवले 
‘बाळ’. बाळाचे नाव ‘बाळ’ हेच ठेवले गेले. प्रबोधनकारांच्या वडिलांचे नाव 
सीताराम जरी होते तरी बळवंतराव हेही एक नाव होते. त्यावरून त्यांनी आपल्या 
पहिल्या मुलाचे नाव ‘बाळ’ सुचविले. तिथेही मुलांचे शिक्षण अर्धवट राहिले. 
तिथून नंतर दादर येथे ठाकरे कुटुंब राहावयास आले. मग बाळासाहेबांसह इतरांचे
 शिक्षण दादरच्या ओरिएन्टल हायस्कूल येथे सुरू झाले. आर्थिक ओढाताणीमुळे 
बाळासाहेबांना आपले शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. त्या वेळी व्हर्नाक्युलर 
मॅट्रिक ते पास झाले. त्यांची राहणी साधी, परंतु कलेची श्रीमंती 
त्यांच्याजवळ होती. त्यांचे कुंचल्यावरचे प्रेम वाढतच होते. प्रबोधनकार 
वेळोवेळी प्रोत्साहन द्यायचे. तसेच सदैव मार्गदर्शन व कलेतील एकाग्रता 
यामुळे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार जन्माला आला. एक अप्रतिम व्यंगचित्रकार 
घडविण्यात बाळासाहेबांच्या वडिलांचा म्हणजेच प्रबोधनकारांचा सिंहाचा वाटा 
आहे. एका कलाकाराच्या पोटी कलाकारच जन्मास येतो असे नेहमीच घडते असे नव्हे.
 परंतु प्रबोधनकार मात्र याला अपवाद आहेत. रमाबाई व प्रबोधनकारांना 
झालेल्या या पुत्राने, आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्याने, लेखणीतील अंगाराने,
 अंगी असलेल्या कणखर नेतृत्वाने महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात आपला 
एक वेगळा दबदबा निर्माण केला. व्यंगचित्रकार, पत्रकार, शिवसेनाप्रमुख, 
हिंदुरक्षणकर्ता म्हणून वेगळा ठसा बाळासाहेबांनी या हिंदुस्थानाच्या 
इतिहासात उमटवला आहे. हिंदुस्थानातील इतिहासकारांना 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा इतिहास लिहिताना बाळासाहेबांच्या शौर्याचा 
इतिहास लिहिण्यासाठी एक प्रकरण राखून ठेवावेच लागेल, नव्हे तो इतिहास 
त्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही.बाळासाहेबांना लहानपणापासून 
व्यंगचित्रकलेची आवड होती आणि ती आवड त्यांनी आपल्या वयाबरोबर वाढविली. 
प्रबोधनकारांचे त्यांना मार्गदर्शन होतेच. प्रबोधनकारांना बाळासाहेब हे 
संगीतकार व्हावेत असं वाटायचं म्हणून त्यांनी बाळासाहेबांना एक बुलबुलतरंग 
आणून दिला. परंतु त्यांना तो जमला नाही आणि हाती त्यांनी कुंचला घेतला. 
‘मराठा मंदिर’ नावाचे एक मासिक त्या काळी निघत असे. बाळासाहेबांची तीन-चार 
व्यंगचित्रे त्या मासिकात प्रथम प्रसिध्द झाली. दैनिकात व्यंगचित्रे 
काढण्याची संधी त्यांना ‘फ्री प्रेस’ या इंग्रजी दैनिकात लाभली. त्या काळी 
म्हणजे १९५२ साली मराठी वृत्तपत्रांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. 
‘फ्री प्रेस जर्नल’ हे वृतपत्र संपादक सदानंद यांच्यामुळे फारच लोकप्रिय 
झाले होते. ‘फ्री प्रेस’मध्ये सुरुवातीस प्रशिक्षणार्थी म्हणून अल्प 
वेतनावर काम करण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीत ‘फ्री प्रेस’मधील 
त्यांच्या व्यंगचित्रांनी ते मान्यताप्राप्त झाले.\मा. बाळासाहेब 
व्यंगचित्रकार म्हणून नावारूपास आले होते. त्यांची व्यंगचित्रांची दखल 
परदेशी वृत्तपत्रेदेखील घेऊ लागली होती. हिंदुस्थानी राजकीय व सामाजिक 
घडामोडींवर आधारित असणारी त्यांची व्यंगचित्रे म्हणजे परदेशातील 
वृत्तपत्रांना एक मेजवानीच असे. ते फ्री प्रेस जर्नलमध्ये रमले असताना 
त्यांना फ्री प्रेस जर्नल सोडावे लागले. त्या वेळी असा समज होता की, 
प्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना बढती मिळाल्यामुळे बाळासाहेब
 ठाकरे नाराज होऊन त्यांनी फ्री प्रेसमधील नोकरी सोडली. पण हा समज नसून 
गैरसमज होता. कारण त्याचे झाले असे, ‘फ्री प्रेस’चे संपादक सदानंद जाऊन 
त्यांच्या जागी नायर आले. एकदा बाळासाहेबांनी स. का. पाटील यांच्यावर 
व्यंगचित्र काढले. तेव्हा नायर यांनी ते छापू नका असे सांगितले. तेव्हा 
बाळासाहेब नायर यांच्यावर चिडले आणि त्यांनी राजीनामा दिला. ही घटना १९५९ 
साली घडली. आर.के. लक्ष्मण यांनी त्याच्या आधी एक वर्ष फ्री प्रेस सोडले 
होते. तसं पाहिलं तर बाळासाहेबांना आवडणाऱ्या व्यंगचित्रकारांत आर. के. 
लक्ष्मण व डेव्हिड लो यांचा समावेश आहे.एका समारंभात मा. बाळासाहेब म्हणाले
 होते की, सध्या व्यंगचित्र काढण्यासाठी व्यक्ती/मॉडेल्स मिळत नाहीत अशी 
चिंता व्यक्त केली जाते. त्याच त्याच बातम्यांमुळे व खालच्या पातळीवर 
राजकारण चालल्यामुळे व्यंगचित्र काढण्यासाठी चांगला विषय सापडत नाही. 
पूर्वीसारखे कुंचला हाती घेऊन एखाद्या राजकीय व्यक्तीचे व्यंगचित्र काढावे 
असे वाटत नाही. इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांची 
व्यंगचित्रे रेखाटताना एक मजा होती. अशी मजा आता येत नाही अशी खंत 
बाळासाहेबांनी व्यक्त केली. बाळासाहेबांची जुनी व्यंगचित्रे गाजलेली आहेत. 
व्यंगचित्रांच्या इतिहासात बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांना एक आगळेवेगळे 
स्थान प्राप्त झाले आहे. राजकीय स्थित्यंतरांची एक मालिका त्यांच्या 
व्यंगचित्रांमुळे डोळ्यांपुढे सरकते.१९५५ साली त्या वेळचे हिंदुस्थानचे 
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या 
वेळी त्यांच्यासमवेत ‘शंकर्स वीकली’चे संपादक शंकर हेही दौऱ्यावर गेले 
होते. आपल्या गैरहजेरीत ‘शंकर्स वीकली’ची जबाबदारी त्यांनी निश्चिंत मनाने 
बाळासाहेबांवर सोपाविली आणि ते रशियाला गेले. शंकर यांच्या गैरहजेरीत या 
साप्ताहिकाची जबाबदारी बाळासाहेबांनी उत्कृष्टपणे सांभाळली. शंकर यांनी 
त्यांच्याविषयी प्रशंसोद्गार काढले होते. शंकर यांनी ‘शंकर्स वीकली’च्या 
टाकलेल्या जबाबदारीमुळे बाळासाहेबांमध्ये व्यंगचित्र साप्ताहिक काढण्यासाठी
 आत्माविश्वास निर्माण झाला. विन्स्टन चर्चिल यांच्या ८० व्या 
वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरित्रात व्यंगचित्रे समाविष्ट करण्यात आली 
होती. यात हिंदुस्थानातून तीन व्यंगचित्रे देण्यात आली होती आणि ही तिन्ही 
व्यंगचित्रे बाळासाहेबांच्या वाट्याला आली हे मराठी माणसाचे भाग्यच होय, 
नाही का?कै. प्रबोधनकार सबकुछ होते तसेच मा. बाळासाहेबदेखील सबकुछ होते. 
मा. बाळासाहेबांचे बहुढंगी, बहुरूपी व्यक्तिमत्त्व होते. शतपैलू 
व्यक्तिमत्त्वाच्या बाळासाहेबांचे एक एक पैलू म्हणजे इतिहास आहे. पुत्र, 
पती, पिता, आजोबा, पत्रकार, व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख 
अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांच्यावर नियतीने टाकल्या व जनता जनार्दनाच्या 
आशीर्वादाने ते या भूमिका साकार करताना त्यांच्यातील माणसाला मात्र त्यांनी
 कधीही पशू बनू दिले नाही, अगदी संकटकाळीसुद्धा.कै. प्रबोधनकारांच्या अंगी 
असलेले गुण त्यांचे पुत्र बाळासाहेबांच्या अंगीदेखील भिनले होते. सडेतोडपणा
 हा बाळासाहेबांच्या विचारांचा गाभा होता. जे पटले त्याला पाठिंबा दिला, 
नाही पटले तिथे संघर्ष केला. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला दोन द्यावे लागतात
 तसेच दोन घेण्याची हिंमतदेखील ठेवावी लागते. ही हिंमत बाळासाहेबांनी 
वेळोवेळी दाखविली आणि ही हिंमत त्यांना प्रबोधनकारांनी दिली होती. 
प्रबोधनकारांकडे फक्त एक जन्मदाता म्हणून ते पाहत नसत, तर प्रबोधनकार माझे 
‘शिक्षक’ होते असे ते म्हणत. त्यामुळेच त्यांच्या भाषणात ‘‘आमच्या दादांनी 
आम्हाला हे शिकविले, हे शिकवले नाही’ असा उल्लेख वारंवार येतो. कै. 
प्रबोधनकारांचे शब्द म्हणजे धगधगता निखारा. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या
 विचारांची धगधगती मशाल बाळासाहेबांनी अहोरात्र तेवत ठेवली. 
बाळासाहेबांसारखा पित्याला फुलाप्रमाणे जपणारा पुत्र लाभल्यामुळे जीवनाच्या
 अखेरच्या कालखंडात दादा समाधानी होते. बाळासाहेबांनी दाही दिशा पादाक्रांत
 केल्यामुळे स्वर्गस्थ प्रबोधनकार धन्य झाले असतील, नव्हे ते म्हणत असतील 
“पुत्र व्हावा ऎसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.”शिवसेनेच्या शिवाजी पार्क 
येथील पहिल्या जाहीर सभेविषयी बाळासाहेबांनी अनेकांशी चर्चा केली होती. सभा
 कुठे घ्यायची, सभेला किती जण येणार? काही जणांचे म्हणणे होते की, सभा 
हॉलमध्ये घेऊया, परंतु बाळासाहेबांचा हट्ट होता, नव्हे विश्वास होता की, 
सभेला लोक जमणार. शिवाजी पार्कवर सभा घेऊया आणि शिवसेनेची पहिली सभा शिवाजी
 पार्क येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडली.शिवसेना भवन 
बांधण्यापूर्वी शिवसेनेचे अधिकृत कार्यालय नव्हते. मा. बाळासाहेबांच्या 
शिवाजी पार्क येथील घरातून शिवसेनेचा कारभार हाकला जात होता. १९७० च्या 
दशकात दादर येथील सेनापती बापट रस्त्यावरील पर्ल सेंटर येथे दोन खोल्या हे 
शिवसेनेचे कार्यालय होते. त्या हॉटेलमधून खाण्यासाठी भजी आवर्जून मागवायचे.
 शिवसेना भवन झाल्यानंतर नित्यनियमाने ते दुपारी १ ते ३ या दरम्यान बसायचे.
 शाखाप्रमुख, पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद साधायचे.कम्युनिस्ट आणि शिवसेना 
यांचे हाडवैर जगाला माहीत आहे. त्या वेळी स्वतंत्र पार्टीच्या मधू मेहता 
यांनी रशियाच्या धोरणाविरुध्द कापडी फलक लावला. एवढेच नव्हे तर महालक्ष्मी 
मंदिरासमोर असलेल्या रशियन लायब्ररीच्या बाहेरच्या भिंतीवर बाळासाहेबांनी 
रात्री १२.०० नंतर ‘उलटास्वस्तिक’ काढला. त्यानंतर रशियन दूतावासावर भगवे 
झेंडे लावले.फोर्ट-मुंबई येथे कामानिमित्त जेव्हा बाळासाहेब जायचे, जेव्हा 
परत येत असताना संध्याकाळी वरळीपासून आरे डेअरी समुद्रकिनाऱ्यालगतच्या 
रस्तावरून बाळासाहेब स्वत: गाडी चालवण्याचा आनंद घ्यायचे. तो क्षण, ती मजा 
काही औरच होती. एकदा शिवसेनेची पनवेल येथे सभा होती. व्यासपीठाच्या समोर 
परंतु थोडी लांब बुरखा घातलेली व्यक्ती बराच वेळ बसली होती. बाळासाहेबांचे 
लक्ष गेले. त्यांनी त्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. बाळासाहेबांची 
अशी चौफेर नजर असे. काही वेळानंतर ती व्यक्ती निघून गेली. मा. 
बाळासाहेबांवर एकूण चार वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला.वसई येथे एक
 जर्मन फादर होता. फादर फेदर त्याचे नाव. तो वसई आणि आजूबाजूच्या गावातील 
गरीब आदिवासी हिंदूंना बाटवत होता. शिवसेनेला ही खबर मिळाली. तेव्हा मा. 
बाळासाहेब त्या फादरला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याच्या गुंडांनी 
हल्ला केला. शिवसैनिकांनी प्रतिहल्ला केला तेव्हा त्यांनी दगडफेक केली. 
त्या दगडफेकीत गाडीची काच फुटली. ती फुटलेली काच सौ. मीनावहिनींना लागली. 
तेव्हा बाळासाहेबांनी औषधोपचार केले.
शिवसेनाप्रमुखांवर नागपूर व माहीम येथे जीवघेणे हल्ले
१९६९ साली शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची नागपूर येथे जाहीर
 सभा झाली. काही महत्त्वाचे काम असल्यामुळे ते सभा संपल्यावर रात्रीच 
मुंबईस यायला निघाले. रात्री दीडचा सुमार होता. शिवसेनाप्रमुखांनी नागपूर 
विमानतळावरच बुक स्टॉलवरून पं. नेहरूंची प्रस्तावना असलेले ( ‘वाईल्ड लाईफ 
इन इंडिया’ ) हे पुस्तक विकत घेतले आणि ते आवडल्यामुळे वाचनात रंगून गेले. 
इतक्यात दिलीप देवधर घाबऱ्या आवाजात सांगू लागले की, “नागपूरच्या 
कुप्रसिध्द लालभाईपैकी नायडू, चौबे, यादव, पाटील इ. दहाजणांचे टोळके तिथे 
आले आहे,” त्यामुळे अर्थात चौघेही जण ‘तय्यार’ होतेच. परंतु सावधगिरी 
म्हणून बाळासाहेब तिथे उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला ती माणसे दाखवून 
त्यांचा बंदोबस्त करायला सांगून पुन्हा आपल्या जागी आले. एवढा प्रकार होतो 
तो ते टोळके त्यांच्याजवळ आले. त्यांचा म्होरक्या नायडूने 
शिवसेनाप्रमुखांजवळ येत आपल्याशी चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. 
विमानाला अगदीच थोडा अवधी होता आणि चर्चा करणे हा निव्वळ बनाव होता. ते आले
 होते निराळ्याच इराद्याने. अर्थात बाळासाहेबांनी नकार दिला. त्याबरोबर 
‘इतना बडा नेता होकर चर्चा नही कर सकते, तो अपमान करना पडेगा’ असे म्हणून 
त्याने काही संशयास्पद हालचाल करताच त्याला पहिला तडाखा खुद्द 
शिवसेनाप्रमुखांनी हाणला. मग इतर अवघे तीनच शिवसैनिक असले तरी गप्प बसतात 
की काय? त्यांनी मग परिणामाची क्षिती न बाळगता त्या टोळक्याला खरपूस रगडून 
काढले. शिवाय मनोहर शामराव पाटील, मोहनसिंग यादव, मनोहर नायडू यांना पकडून 
तिथे बघ्याच्या भूमिकेत उभ्या असलेल्या पोलिसांच्या हवाली केले. 
त्यांच्यातला सर्वांत धोकेबाज समजला जाणारा चौबे याची अशी खातरजमा 
शिवसैनिकांनी पटवून दिली की तो अक्षरश: ढुंगणाला पाय लावून कुंपणावरून 
सरड्यासारखा पळाला ! दहा विरुध्द चारांचा हा सामना पाहून सर्वजण स्तिमित 
झाले. हे सर्व चालले असता स्टुडंट युनियनचे कार्यकर्ते मात्र एका कोपऱ्यात 
उभे राहून भेदरट नजरेने पाहत होते.हा सर्व प्रकार नागपूरची पोलीस मंडळी 
सिनेमासारखी पाहत बसली होती. कमाल आहे ! अशा बघ्या लोकांची नेमणूक सरकार का
 करते हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रकरणात शिवसैनिकांची ताकद 
काय आहे याचा प्रत्यय तर लालभाईंना आलाच, पण त्यांचा सेनापतीदेखील तसाच 
धडाडीचा नि साहसी आहे याचेही प्रत्यंतर मिळाले. या लढाईमुळे नागपुरातल्या 
तथाकथित भयंकर लालभाईंची अब्रू अक्षरश: उघड्यावर आली आणि नागपुरात त्यांना 
तोंड दाखवायला जागा उरली नाही. शिवसेनेशी दिलेला सामना किती गरम पडतो हेही 
त्यांच्या चांगले लक्षात आले असेल.दुसरी घटना माहीमची. शिवसेनाप्रमुख 
सपत्नीक दादरहून वांद्र्याला जाणण्यासाठी रात्री निघाले होते. माहीम 
चर्चजवळ गाडी आली आणि एका टॅक्सी ड्रायव्हरने त्यांच्यासमोर गाडी काढण्याचा
 प्रयत्न केला. शिवसेनाप्रमुखांनी गाडी उभी करून त्याला जाब विचारला. हा 
ड्रायव्हर मुसलमान असल्यामुळे आणि माहीमची वस्ती मुसलमानांची असल्यामुळे 
ताबडतोब त्या भागातील अनेक मुसलमान गाडीजवळ गोळा झाले. हे दृश्य बघून 
शिवसेनाप्रमुखांनी आपले रिव्हॉल्व्हर जमावावर रोखले आणि ते तेथून सरळ पोलीस
 स्टेशनला गेले. त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला पकडून आणण्यात 
आले.शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचे नेते महाडमार्गे कोकण दौऱ्यावर गेले. 
तेथून परत येत असताना कौसा गावाजवळ एका बैलगाडीवाल्याने बैलगाडी पुढे 
काढण्याचा प्रयत्न केला. त्याला बैलगाडी थांबवण्याची विनंती शिवसैनिकांनी 
केली, परंतु ती विनंती या गाडीवाल्याने मानली नाहीच. उलट विनंती करणाऱ्या 
शिवसैनिकाला चाबकाने फटकाविले आणि भगव्या झेंड्याला शिव्या दिल्या. 
त्यावरून बोलाचालीस सुरुवात होते न होते तोच कौसा गावातून शे-दोनशे लोकांची
 झुंड येऊन त्यांनी बेफाम दगडफेक व सोडावॉटरच्या बाटल्यांनी हाणामारीस 
सुरुवात केली. बैलगाडीवाला मुसलमान होता म्हणून तेथील जातभाई संघटित झाले. 
या प्रकाराला अनिष्ट वळण लागू नये या हेतूनेच केवळ कसेबसे स्वत:चे संरक्षण 
करीत गाड्या पुढे रवाना झाल्या. गाडीत बसलेले श्री. भालचंद्र ठाकूर आणि इतर
 शिवसैनिक तात्काळ खाली उतरले आणि त्यांनी अंगावर येणारी मुस्लिमांची झुंड 
रोखली.दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांच्या गाड्या महाडला जात असताना वाटेत कौसा 
गावाजवळ दगडफेक होऊन दंगल पेटली. कौसा गावात आगी लावण्यात आल्या. 
एस.टी.च्या गाड्या मागे परतल्या. या सर्व शिवसैनिकांबरोबर दत्ताजी साळवी, 
मनोहर जोशी, सुधीर जोशी आदी होते. ही सर्व गडबड सुरू झाल्यामुळे थोड्याच 
वेळात तेथे पोलिसांच्या गाड्या आल्या आणि एका सब-इन्स्पेक्टरने मनोहर 
जोशींवर रिव्हॉल्व्हर रोखले. कदाचित गोळीसुध्दा झाडली असती, परंतु 
शिवसेनेचे श्री. शरद आचार्य हे मध्ये पडले व त्यांनी स्वत:जवळचे खाजगी 
रिव्हॉल्व्हर काढून पोलीस अधिकाऱ्यावर रोखून धरले व त्यास रागाने विचारले, 
‘‘मनोहर जोशींना ओळखत नाहीस काय? तू जर गोळी घातलीस तर पुरा महाराष्ट्र 
पेटेल.” शरद आचार्यांचा रोख आणि आव्हान पाहून पोलीस अधिकारी सरळ झाला आणि 
त्याने जोशींची माफी मागितली.मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 
महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राष्ट्रातील एक जबरदस्त राजकीय व्यक्ती बनली 
होती. आपल्या देशातील राजकीय नेत्यांची मुले राजकारणात उतरलेली आहेत. 
राजकारणात घराणेशाहीला मग ती कुठलीही असो, याला अपवाद मात्र मा. 
बाळासाहेबांचा. आपल्या तिन्ही मुलांनी राजकारणात पडावे असे मात्र कधीही 
त्यांना वाटले नाही. तसा हट्ट अथवा प्रयत्नदेखील त्यांनी केला नाही. आपल्या
 मुलांनी संसार सुखाने नीट चालावावा याकडे त्यांचे पिता म्हणून, 
कुटुंबप्रमुख म्हणून लक्ष असे. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या काळात आपल्या 
मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना याकडॆ त्यांचे लक्ष असे. आज जगभर हिंदू 
नेते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख आहे. एक धुरंधर राजकीय नेते म्हणून 
त्यांची गणना केली जाते.१९९५ सालची विधानसभा शिवसेना-भाजपा युतीने जिंकली. 
‘याची देही याची डोळा’ मा. शिवसेनाप्रमुखांचे शिवशाही व विधानसभेवर भगवा 
फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर लगेच १९९६ ची लोकसभा निवडणूक 
होणार होती. शिवसेना आपल्या सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरली. मा.
 बाळासाहेब प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईबाहेर गेले होते. त्या दिवशी
 बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र बिंदुमाधव यांच्यावर महासंकट कोसळले. 
त्यांच्या गाडीला जबरदस्त अपघात झाला. त्या अपघातात बिंदुमाधवांचं दुर्दैवी
 निधन झालं. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. 
ठाकरे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळवणारी ही परिस्थिती मोठी गंभीर 
होती. अत्यंत कठीण प्रसंग होता. मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांनी मनाचा दगड 
करून ही दु:खद वार्ता बाळासाहेबांना कळवली. माझ्या लाडक्या बिंदुमाधवचं 
निधन! तेही अपघाती निधन! अरेरे ! बाळासाहेब कमालीचे सुन्न झाले. प्रचार 
दौरा अर्ध्यावर सोडून बाळासाहेबांनी मुंबईकडे धाव घेतली. मुलाच्या निधनाची 
बातमी ऎकून बाळासाहेब कमालीचे कासावीस झाले होते. त्यांचा गळा दाटून आला 
होता. श्वासही कोंडला होता. बिंदुमाधवाचा पार्थिव देह पाहून त्यांचा बांध 
फुटला. दु:खाचा ओघ वाहू लागला. असह्य दु:खामुळे डोळ्यांतून अश्रूंच्या अखंड
 धारा वाहू लागल्या. बिंदुमाधवचा मृत्यू बाळासाहेबांच्या मनस्वी 
पितृहृदयाला सहन होत नव्हता. कुठल्याही क्षणी ते सर्वार्थाने कोलमडून पडतील
 अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रयत्नाने बाळासाहेब 
बिंधुमाधवच्या निधनाचं दु:ख सहन करीत होते. स्वत:च स्वत:ला धीर देते होते. 
आधार देत होते. आणि पुन्हा सहा महिन्याच्या आत आणखी एक जीवन उन्मळून 
टाकणारा प्रचंड आघात झाला. पत्नी मीनाताईंच्या निधनाचा नियतीने आणखी एक 
जबरदस्त हादरा दिला! शिवसैनिकांच्या माँसाहेब, हिंदुहृदयसम्राट 
शिवसेनाप्रमुखांची सावली हे जग सोडून गेली. यामुळे शिवसेनाप्रमुख पुन्हा 
एकदा उन्मळून गेले. बिंधुमाधव आणि मीनाताई यांच्या जाण्याने बाळासाहेब खचले
 होते. पण त्यांनी ते कधीच आपल्या चेहऱ्यावर दिसू दिले नाही.काही 
वर्षांनंतर ज्याच्यावर पुत्रवत प्रेम केले, ज्याला मुख्यमंत्री केले त्या 
नारायण राणेंची हकालपट्टी करावी लागली. पुतण्या राजही सोडून गेला. आपली 
सारी दु:खं विसरून मा. बाळासाहेब अतिशय ताठ मानेने, पूर्ण आत्माविश्वासाने 
जीवनसंग्रामात ठामपणे उभे राहिले. आपल्या मराठी माणसासाठी! आणि हिंदू 
धर्मासाठी!! त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही. शिवसेनेच्या सामाजिक आणि 
राजकीय कार्यासाठी मा. बाळासाहेब अहोरात्र झटत राहिले. महाराष्ट्रात पुन्हा
 शिवशाही यावी, मंत्रालयावर भगवा फडकावा हे त्यांचे स्वप्न होते आणि 
त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांचे कर्तव्य 
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा